नगर - नगर तालुक्यातील हिवरे झरे येथे मंगळवारी (२५ नोव्हेंबर) सकाळी ९ वाजता शेतकरी, वारकरी मेळावा व पुरस्कार वितरण, दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगद्गुरु शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी, करवीर पीठ असणार आहेत. याच दिवशी शेतकरी, वारकरी महासंघाची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती साकळाई कृती समिती, शेतकरी वारकरी महासंघ, हिवरे झरे ग्रामस्थ यांनी दिली.
जगद्गुरु शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांचे २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता हिवरे झरे येथे आगमन होणार आहे. स्वामींचे आगमन झाल्यानंतर शेतकरी, वारकरी, भाविकांच्यावतीने भव्य स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर भव्य मिरवणुकीला सुरुवात होईल. मिरवणुकीत पारंपारिक वाद्य, टाळ मृदृगाचा जयघोष, उंच पताका, वारकरी, विद्यार्थी, जिल्ह्यातील दिग्गज किर्तनकार, जिल्ह्यातील नेते मंडळी, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळी, वारकरी पंच्रक्रोशीतील भाविक सहभागी होणार असून मिरवणुकीनंतर जगद्गुरु शंकराचार्य शेतकरी, वारकरी मेळाव्यास संबोधित करणार आहेत. त्यानंतर दर्शनाचा कार्यक्रम होईल. उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाराष्ट्र वारकरी संप्रदाय संघटना, साकळाई योजना कृती समिती, हिवरे झरे ग्रामस्थ तरुण मंडळ प्रयत्न करत आहेत.
यावेळी समाजामध्ये आदर्श काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळावे म्हणून आदर्श काम करणाऱ्या व्यक्तींचा समाज भुषण पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शेतकरी, वारकरी मेळाव्याची नगर, श्रीगोंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी फ्लेक्स लावण्यात आले आहेत. सर्व क्षेत्रातील मान्यवरांशी संपर्क केला आहे. त्यामुळे नगर तालुक्यातील हिवरे झरे, बाबुर्डी बेंद, वाळकी, घोसपुरी, देऊळगाव सिद्धी, रुईछत्तीशी, खडकी, खंडाळा, अरणगाव, बाबुर्डी घुमट, सारोळा कासार, अस्तगाव, श्रीगोंदा तालुक्यातील चिखली, कोरेगाव, घुटेवाडी, सुरेगाव, कोळगाव, मांडवगण या गावांमधून शेतकरी, वारकरी मेळाव्यास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार असल्याची माहिती साकळाई कृती समितीचे अध्यक्ष बाबा महाराज झेंडे यांनी सांगितले.

Post a Comment