नगर तालुक्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार ! कुठे घडली घटना...



नगर तालुका : नगर तालुक्यातील इमामपूर परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. सोमवार दि.३० मार्च रोजी भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात चार शेळ्या ठार झाल्याची घटना घडल्याने परिसरातील नागरिक व शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, इमामपूर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. तसेच या परिसरात रानटी कुत्र्यांची संख्या देखील जास्त आहे. मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचे कळप गाव परिसरात भटकताना दिसून येतात. सोमवारी कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात अरबाज रशीद शेख यांच्या दोन शेळ्या तर अकिल मुख्तार शेख यांच्या दोन शेळ्या अशा चार शेळ्यांचा फडशा पाडण्यात आला असल्याची माहिती ग्रामस्थांकडून समजली.

आठ ते दहा दिवसापूर्वी इमामपूर येथेच भागचंद्र दयानंद पाटोळे यांच्याही तीन शेळ्या ठार करण्यात आल्या होत्या. तर मागील वर्षी रवींद्र सयाजी पाटोळे यांच्याही तीन शेळ्यांचा भटक्या कुत्र्यांकडून फडशा पाडण्यात आल्याच्या घटना घडलेल्या आहेत. कुत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ला करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर शालेय विद्यार्थी व नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण दिसून येते. जेऊर परिसरात देखील भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येते.

भटक्या कुत्र्यांचे कळपचे कळप परिसरात फिरताना दिसतात. गावठाण परिसरात तसेच मानव वस्तीत कुत्र्यांकडून पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तरी परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

महानगरपालिकेच्या वतीने पकडण्यात आलेले भटके कुत्रे इमामपूर परिसरात आणून सोडल्याबाबत नागरिकांमध्ये चर्चा आहे. जर अशाप्रकारे कुत्रे आणून सोडले जात असतील तर ते तात्काळ बंद करण्याची गरज आहे. तसेच गाव परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी. नागरिकांनी देखील काळजी घ्यावी. विशेषता लहान मुले व शालेय विद्यार्थ्यांनी दक्षता घेण्याची गरज आहे. घर परिसर स्वच्छ ठेवावा. - बाजीराव आवारे ( सरपंच, इमामपूर )

0/Post a Comment/Comments