अहिल्यानगर - छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्यातील गड कोटांचे संवर्धन व स्वच्छता मोहीमेअंतर्गत रविवारी (२५ मे) पुणे जिल्ह्यातील रायरेश्वर किल्ल्यावर स्वच्छता व संवर्धन मोहिम राबविण्यात येणार आहे. खा. निलेश लंके यांच्या संकल्पनेतेतील या मोहीमेतील हा तिसरा किल्ला असून त्यासाठी स्वयंसेवक शनिवारी (२४ मे) सायंकाळी किल्ल्याकडे प्रस्थान करणार आहेत.
१० मार्च रोजी खा. निलेश लंके यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यातील गट कोटांचे संवर्धन व स्वच्छता मोहिम हाती घेण्याची घोषणा करून मार्च महिन्यामध्येच १६ मार्च रोजी शिवजन्मभुमी शिवनेरीपासून या मोहिमेचा श्रीगणेशा करण्यात आला होता. एप्रिल महिन्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृती जतन करणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील पेडगांव येथे धर्मवीर गडावर दुसरी स्वच्छता व संवर्धन मोहिम राबविण्यात आली. निलेश लंके प्रतिष्ठानचे सभासद तसेच शिवप्रेमी असे हजारो मावळे या मोहिमांमध्ये सहभागी झाले होते.
दोन यशस्वी मोहीमांनंतर आता जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली त्या पुणे जिल्ह्यातील भोर येथील रायरेश्वर गडावर स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहीमेसाठीही हजारो शिवप्रेमी तसेच निलेश लंके प्रतिष्ठानच्या सभासदांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे.
खा. लंके यांचा गडावर मुक्काम
या मोहिमेच्या निमित्ताने खासदार निलेश लंके हे शनिवारी सायंकाळीच रायरेश्वर गडावर हजेरी लाऊन तिथेच मुक्काम करण्यार आहेत. गडावरील सभामंडपात ते विश्रांती घेऊन सकाळी सात वाजता सुरू होणाऱ्या स्वच्छता व संवर्धन मोहीमेत सहभागी होणार आहेत. गडावर मुक्काम करणारे खा. निलेश लंके हे पहिलेच लोकप्रतिनिधी ठरणार आहेत.
मोहीमेसाठी बसची व्यवस्था
या मोहीमेत सहभागी होणाऱ्या मावळयांसाठी अहिल्यानगर व पारनेर येथून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. अहिल्यानगर-सुपा-पारनेर-शिरूर-तळेगांव ढमढेरे-अष्टापूर-उरूळीकांचन-सासवड-नारायणपुर-कापुरहोळ-भोर-रायरेश्वर गड या मार्गाने बसेस जाणार आहेत. शनिवारी सायंकाळी ६ वाजता नगर येथून तर सायंकाळी ७ वाजता पारनेर येथून बसेस प्रस्थान करतील व भोर येथे मुक्कामी जातील.
मोहिमेत भोजन, नाश्त्याची सोय
मुक्कामाच्या ठिकाणी शनिवारी रात्रीचे जेवण, रविवारी सकाळचा नाश्त्याची तसेच दुपारच्या जेवणाची निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. मुक्कामासाठी आंथरूण, पांघरूण, हलके ब्लँकेट, मुक्कामाच्या कालावधीसाठी हवामानाच्या स्वरूपानुसार पुरेसे कपडे, आरामदायक पोषाख, रेनकोट, स्वतःची औषधे सोबत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment