खडकी येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या ५ जणांना वाचविण्यास प्रशासनाला यश


नगर तालुका (प्रतिनिधी)- नगर तालुक्याच्या दक्षिण भागात मंगळवारी (दि.२७) दुपारपासून ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळल्याने पूर्वा व वालुंबा या नद्यांना महापूर आला. या दोन नद्यांचा संगम खडकी गावाजवळ असून या ठिकाणी दोन्ही नद्यांचे पाणी एकत्र होवून मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. या पुराच्या पाण्यात नदीकाठीच राहणारे शहाजी कोठुळे यांच्या कुटुंबातील ५ जण अडकले होते. त्यांना सुखरूप पाण्याच्या बाहेर काढण्यात पोलिस व प्रशासनाला अखेर यश आले आहे.

नगर तालुक्यातील कामरगाव, चास, भोरवाडी, सोनेवाडी, अकोळनेर, सारोळा कासार, अस्तगाव, खडकी, बाबुर्डी बेंद या परिसरात दुपारी १२.३० च्या दरम्यान मुसळधार पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच पावसाने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे कामरगाव परिसरात उगम पावणार्‍या वालुंबा नदीला काही वेळातच महापूर आला. या पुरामुळे अकोळनेर ते भोरवाडी रस्ता वाहून गेल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला. नदीवरील सारोळा गावाकडे जाणार्‍या रस्त्यावरील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहत असल्याने अकोळनेर ते सारोळा वाहतूकही ठप्प झाली. अस्तगावकडून पूर्वेकडे वाहणार्‍या पूर्वा नदीलाही मोठ्या प्रमाणावर पूर आला. त्यामुळे अस्तगाव-सारोळा रस्त्यावरील वाहतूक बंद झाली.

या दोन्ही नद्या खडकी गावाजवळ एकत्र येतात. तेथे पुराच्या पाण्याचे रौद्र रूप पाहायला मिळाले. या पुराच्या पाण्यात शहाजी कोठुळे यांच्या कुटुंबातील ५ जण अडकले होते. याची माहिती मिळताच नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक संपतराव भोसले, प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे हे ही घटनास्थळी आले. नगर पारनेर चे आमदार काशिनाथ दाते, माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश यांनीही घटनास्थळी धाव घेत मदत कार्य करणाऱ्या पथकाला सूचना दिल्या.

स्थानिक नागरिकांच्या मदतीने सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते, पो.हे.कॉ. नितीन गांगर्डे यांनी स्वत: पाण्यात उतरून दोरखंडाच्या सहाय्याने पुराच्या पाण्यात अडकलेल्या पाचही जणांना सुखरूप बाहेर काढले.

0/Post a Comment/Comments