दुर्दैवी घटना...नगर तालुक्यात झाडाला गळफास घेऊन वारकऱ्याची आत्महत्या

नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील रुईछत्तीसी गावच्या शिवारात शेतातील कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन एका वारकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना ३० जून रोजी सकाळी उघडकीस आली. सुखदेव लक्ष्मण रावे (वय ६२, रा. मिसळवाडी, बुलढाणा) असे आत्महत्या केलेल्या वारकऱ्याचे नाव आहे.

मयत सुखदेव रावे यांचा केस कर्तनाचा व्यवसाय असून ते दरवर्षी पंढरपूरची वारी करत होते. या वर्षी ते गावाहून आळंदी येथे गेले, तेथून दिंडीत सहभागी झाले, दिंडीचा मुक्काम नातेपुते येथे असताना त्यांनी एसटी बसने पंढरपूर गाठले, तेथे विठ्ठलाचे दर्शन घेवून ते पुन्हा एसटी बसने गावाकडे जात होते. मात्र २९ जून रोजी सायंकाळी ते रुईछत्तीशी गावाजवळ उतरले होते. त्यानंतर ३० जून रोजी सकाळी धर्मा अण्णा गोरे यांच्या शेतात कडुनिंबाच्या झाडाला त्यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

ही माहिती नगर तालुका पोलिसांना कळविण्यात आल्यावर पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून रावे यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून ते औषध उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार आबासाहेब झावरे करीत आहेत. मयत रावे यांचे शवविच्छेदन केल्यावर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पक्षात पत्नी, तीन भाऊ, एक बहीण, एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

0/Post a Comment/Comments