स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेबाबत निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला महत्वाचे निर्देश



मुंबई -: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी फेर प्रभाग रचना करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार आता राज्य सरकारला फेर प्रभाग रचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मागील जवळपास पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. त्यामुळे राज्यभरातील राजकारण्यांमध्ये अस्वस्थता होती. मात्र अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आता आगामी चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने देखील तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यातच आता निवडणूक आयोगाने देखील या निवडणुका लवकरात लवकर घेण्यासाठी कंबर कसली आहे. यात आता राज्य सरकारला फेरफार रचना करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आले आहेत.
1994 ते 2022 पर्यंत ओबीसी आरक्षणाच्या स्थितीनुसार निवडणुका

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील 4 महिन्यांच्या आत घेण्याचे महूत्वपूर्ण निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करताना दिले. कोर्टाने ही निवडणूक 1994 ते 2022 पर्यंत ओबीसी आरक्षणाची जी स्थिती होती त्यानुसार घेण्याचे आदेश दिलेत. विशेषतः राज्य निवडणूक आयोगाला यासंबंधी 4 आठवड्यांच्या आत अधिसूचना जारी करण्याचेही निर्देश दिलेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार दिवाळीपूर्वी उडणार हे निश्चित झाले आहे. ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे महाराष्ट्रात 2021 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत व न्यायमूर्ती एन के सिंह यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणी सुनावणी झाली. त्यात कोर्टाने ह्या निवडणुका 4 महिन्यांच्या आत घेण्याचे निर्देश दिलेत. कोर्टाच्या आदेशांनुसार, ओबीसी समुदायाला 2022 पूर्वी असणारे आरक्षण कायम ठेवून 4 महिन्यांच्या आत ही निवडणूक घ्यावी लागेल. ही निवडणूक बांठिया आयोगाच्या अहवालाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील निकालाच्या अधीन असतील, असेही कोर्टाने या प्रकरणी स्पष्ट केले आहे.

0/Post a Comment/Comments