नगर तालुक्यातून एकाच दिवशी ३ मुली झाल्या बेपत्ता, २ सख्ख्या बहिणींचा समावेश


नगर तालुका (प्रतिनिधी)  - नगर तालुक्यातील २ वेगवेगळ्या गावांमधून एकाच दिवशी ३ मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यात २ सख्ख्या बहिणींचा समावेश आहे. या मुलींना कोणी तरी कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याचा संशय त्यांच्या कुटुंबियांना असून त्यांनी नगर तालुका व भिंगार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून २ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नगर - सोलापूर रोडवरील दरेवाडी परिसरातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आणि २१ वर्षीय तरुणी अशा दोघी सख्ख्या बहिणी बेपत्ता झाल्या आहेत. ही घटना २३ मे रोजी दुपारी १२ ते रात्री ८ वाजेच्या दरम्यान घडली आहे. दोघी बहिणी घरी होत्या तर त्यांचे कुटुंबीय बाहेर गेलेले होते. रात्री कुटुंबीय घरी आले तेव्हा त्यांना मुली घरात आढळून आल्या नाहीत. त्यांचा दरेवाडी परिसर, नातेवाईक व मुलीच्या मैत्रिणीकडे चौकशी करुन शोध घेतला असता त्या कोठेही मिळून आल्या नाहीत. त्यामुळे त्यांना कोणीतरी कशाचेतरी आमिष दाखवून फूस लावून  पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत त्यांच्या आईने २५ मे रोजी  भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरुद्ध बी एन एस कलम १३७ () प्रमाणे अपहरणाचा  गुन्हा दाखल केला आहे.

तर दुसऱ्या घटनेत नातेवाईकाच्या लग्नाला आईसोबत आलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना नगर तालुक्यातील मठपिंप्री येथे २३ मे रोजी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान घडली. या बाबत अपहृत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की फिर्यादी या त्यांच्या मुलींसह मठपिंप्री गावामध्ये नातेवाईकाच्या लग्नास गेल्या असता त्यादरम्यान मुलीस कोणीतरी अनोळखी इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून, पळवुन नेले आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध बी एन एस कलम १३७ () प्रमाणे अपहरणाचा  गुन्हा दाखल केला आहे.

0/Post a Comment/Comments