नगर तालुका (प्रतिनिधी) - टपरीचा पत्रा काढून घेण्यास सांगितले असतानाही तो काढत नाही, त्यामुळे तुझ्या चुलत भावास समजावून सांग असे म्हटल्याचा राग येवून तिघांनी हॉटेलचालकासह त्याच्या कुटुंबातील महिलांना शिवीगाळ करीत लोखंडी पाईपने, लाथाबुक्क्यानी बेदम मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना नगर तालुक्यातील खारेकर्जुने येथे शुक्रवारी (दि.२३ मे) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत संभाजी अर्जुन मुळे (वय ४२, रा. खारेकर्जुने, ता.नगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी मुळे यांचे खारेकर्जुने गावात वडापाव व नाष्ट्याचे हॉटेल आहे. त्याच्या शेजारी अविनाश तांबे याचे पंक्चरचे दुकान आहे. या दुकानाचा पत्रा फिर्यादी यांच्या हॉटेल समोर आलेला होता. तो काढण्याबाबत त्यांनी तांबे यास अनेकदा सांगूनही त्याने तो काढला नव्हता. शुक्रवारी तेथे अविनाश चा चुलत भाऊ पिनू आप्पासाहेब तांबे, बंटी बाळासाहेब तांबे, बबलू पिनू तांबे, (सर्व रा. इसळक, ता.नगर ) हे बोलेरो गाडीतून आले.
त्यावेळी फिर्यादी यांनी पिनू तांबे यास म्हटले की तुझा चुलत भाऊ यास टपरीचा पत्रा काढून घेण्यास सांगितले. परंतु तो काढत नाही त्या समजावून सांग. असे म्हटल्याचा राग आल्याने त्याने फिर्यादीस शिवीगाळ केली, तसेच तिघांनी बोलेरो गाडीतून लोखंडी पाईप काढून फिर्यादीस मारहाण सुरु केली. तो आरडाओरडा ऐकून फिर्यादीचे आई,वडील, पत्नी, बहीण, भाचा हे तेथे आले असता त्यांना ही या तिघांनी लोखंडी पाईपने व लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीसह चंद्रकला अर्जुन मुळे, धनश्री शिवाजी मुळे, अर्जुन कारभारी मुळे, स्वप्नील टांगळ, संगीता टांगळ व मनीषा मुळे हे जखमी झाले.
याप्रकरणी संभाजी मुळे यांनी दिलेला फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात पिनू तांबे, बंटी तांबे, बबलू तांबे यांचे विरुद्ध बी एन एस कलम ११८(१), ११५ (२), ३५२, ३५१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहा व्हिडीओ...
Post a Comment