अहिल्यानगर -अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आणि विशेषतः अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील प्रवाशांच्या सोयीसाठी आता नागपूर ते पुणे हे वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू करण्यास रेल्वे मंत्रालयाने हिरवा झेंडा दाखविला आहे. या गाडीला अहिल्यानगर येथे अधिकृत थांबा देण्यात आला असून जिल्ह्यातील प्रवाशांना आता जलद, आरामदायक आणि उच्च दर्जाच्या प्रवासाची सुविधा मिळणार असल्याचे खा. निलेश लंके यांनी सांगितले.
पुणे येथे २३ जुलै रोजी पार पडलेल्या रेल्वे सल्लागार मंडळाच्या बैठकीत अहिल्यानगर स्थानकावर विविध गाड्यांना थांबा देण्याची मागणी खा.निलेश लंके यांनी केली होती. त्याची दखल घेऊन वंदे भारत एक्सप्रेसला थांबा देण्यात आला आहे. १० ऑगस्ट रोजी नागपूरहून या रेल्वे सेवेला सुरूवात होणार असून अजनी, नागपूर येथून सोमवार वगळता आठवडयातून ६ दिवस ही गाडी पुण्याकडे प्रस्थान करणार आहे, तर पुण्याहून मंगळवार वगळता आठवडयातून ६ दिवस ही गाडी अजनी, नागपूरकडे प्रस्थान करणार आहे.
अजनी, नागपूरहून पुण्याकडे जाताना या गाडीचे अहिल्यानगर स्थानकावर सायंकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी आगमन होईल व ७ वाजून ३७ मिनिटांनी पुण्याकडे प्रस्थान होईल. पुण्याहून अजनीकडे प्रस्थान करताना अहिल्यानगर स्थानकावर ही गाडी सकाळी ८ वाजून ३३ मिनिटांनी पोहचेल व ८ वाजून ३५ मिनिटांनी अजनी, नागपूरकडे प्रस्थान करेल. अजनी, नागपूर स्थानकावरून ही एक्सप्रेस सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी सुटेल तर पुण्याहून सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी नागपूरसाठी सुटणार आहे.
'वंदे भारत' मुळे सकारात्मक बदल होईल
वंदे भारतसारखी उच्च दर्जाची सेवा जिल्ह्याला मिळणे ही ऐतिहासिक बाब आहे. त्यामुळे रोजगार, शिक्षण, व्यापार, आरोग्य आणि संपर्क यामध्ये मोठया प्रमाणावर सकारात्मक बदल होईल. नागपूर आणि पुणे या दोन महत्वाच्या शहरांशी जिल्ह्याचा थेट संपर्क सुलभ होईल. असे खा. लंके म्हणाले.
विशेष उद्घाटन सोहळ्याचे आयोजन
ही सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खा. लंके यांनी आभार मानले. ही सेवा केवळ प्रवासाचे अंतर कमी करणार नाही तर जिल्ह्याच्या सर्वागीण विकासाला चालना देणारी ठरेल असे सांगत खा. लंके यांनी सांगितले की या नव्या सेवेसंदर्भात लवकरच अहिल्यानगर स्थानकावर विशेष उद्घाटन सोहळयाचे आयोजन करण्यात येणार आहे.
Post a Comment