मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत मोठी घडामोड झाली आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू असून राष्ट्रवादी शरद पवार गटाने देखील बारामतीतून माघार घेतली आहे. मात्र, असे असतानाच काँग्रेसने दोन्ही ठिकाणच्या पोटनिवडणूक लढण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून ‘ग्रीन सिग्नल’ही मिळाला आहे. त्यापार्श्वभूमीवर मुलाखती देखील पार पडल्या आहेत.
एकीकडे शरद पवार गटाने सुनेत्रा पवारांना पाठिंबा दर्शवत निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या, तर दुसरीकडे काँग्रेसने स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवली आहे. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे वरिष्ठ नेते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्याशी चर्चा करणार आहेत.
गुरुवारी याच पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेसची बैठक पार पडली. काँग्रेस पक्ष राहुरी आणि बारामतीची निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे चित्र असून त्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून ‘ग्रीन सिग्नल’ मिळाल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसमधील अनेकांनी दोन्ही पोटनिवडणूक लढण्यासाठी तयारीही दर्शवली आहे.
याबाबत माहिती देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “राहुरी आणि बारामती येथून इच्छुक उमेदवारांशी आमची चर्चा झाली आहे. बारामतीसाठी सहा तर राहुरीसाठी चार अर्ज आले आहेत. सर्व उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती पार पडल्या आहेत. दोन्ही ठिकाणचे कार्यकर्ते निवडणूक लढण्यासाठी उत्सुक आहेत. कार्यकर्त्यांच्या उत्सुकतेपोटी निवडणुकीबाबत दोन दिवसांत निर्णय होईल.”
वंचित आणि रासपला सोबत घेतले
काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांची ‘वंचित बहुजन आघाडी’ आणि महादेव जानकर यांचा ‘राष्ट्रीय समाज पक्ष’ (रासप) यांचाही आपल्यात समावेश केला आहे. या नवीन समीकरणामुळे काँग्रेस बारामती आणि राहुरीच्या निवडणुकीत उतरणार आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाची लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेस-रासपचा उमेदवार देऊ शकतो. तर, राहुरीत काँग्रेस स्वतःचा उमेदवार देऊ शकते. महाराष्ट्र काँग्रेसला दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी देखील निवडणुका लढवण्यासाठी हिरवा सिग्नल दिला आहे.
हे ही वाचा ...
'धुरंधर 2' बॉक्स ऑफिसवर कमाईही ठरला धुरंधर, जगभरात कमावले 'इतके' कोटी

Post a Comment