मुंबई
- नामिबियाविरुद्धच्या 'करो या
मरो' सामन्यात पाकिस्ताननं विजय मिळवला
आहे. कोलंबोत झालेल्या या सामन्यात पाकिस्ताननं नामिबियाला १०२ धावांनी पराभूत
केलं. या विजयासह पाकिस्ताननं सुपर ८ मध्ये स्थान निश्चित केलं आहे. पाकिस्तान हा
सुपर ८ मध्ये पोहोचणारा आठवा म्हणजेच अखेरचा संघ ठरला आहे. पाकिस्तानच्या सुपर
एन्ट्रीनं टी २० वर्ल्डकपमध्ये पुन्हा 'महामुकाबला' होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कदाचित
सेमीफायलनमध्ये भारत आणि पाकिस्तान हायव्होल्टेज सामना बघायला मिळू शकतो.
पाकिस्तानचा
दुबळ्या नामिबियाविरुद्ध मोठा विजय
कोलंबोतील
मैदानावर पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी केली. नामिबियासमोर २०० धावांचं आव्हान ठेवलं.
हे भलंमोठं आव्हान घेऊन उतरलेला नामिबिया संघ १०० धावाही करू शकला नाही. २००
धावांचं लक्ष्य गाठण्याच्या इराद्यानं मैदानात उतरलेला नामिबिया संघ ९७ धावांतच
गुंडाळला. पाकिस्ताननं या अत्यंत महत्वाच्या सामन्यात विजय मिळवून सुपर ८ मध्ये
दमदार एन्ट्री केली.
भारताविरुद्ध
झिरो, नामिबियाविरुद्ध हिरो
नामिबियाला
१०० धावांच्या आतच गुंडाळलं. यात पाकिस्तानचा मिस्ट्री स्पिनर उस्मान तारीकचा
महत्वाचा वाटा होता. तारीक यानं ३.३ ओव्हरमध्ये १६ धावा देत ४ विकेट घेतल्या.
तारीखच्या कारकिर्दीतील ही सर्वोच्च कामगिरी ठरली. शादाब खान यानं ४ ओव्हरमध्ये
तीन विकेट घेतल्या.
तत्पूर्वी, नामिबियावर साहिबजादा फरहान हा तुटून पडला
होता. त्यानं ५८ चेंडूंमध्ये १०० धावा केल्या. त्याच्या विस्फोटक शतकी खेळीच्या
जोरावर पाकिस्ताननं १९९ धावांचा डोंगर उभा केला. नामिबियासमोर २०० धावांचं आव्हान
ठेवलं.
सुपर ८
मधील संघ ठरले
पाकिस्तानचा
संघ सुपर ८ मध्ये पोहोचला आहे. सुपर ८ मधील संघांची नावंही निश्चित झाली आहेत. एका
गटात भारत, झिम्बाब्वे, वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका हे चार संघ आहेत. तर दुसऱ्या गटात
पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड आणि
श्रीलंका हे चार संघ आहेत.
सेमिफायनलमध्ये
भारत – पाकिस्तान भिडणार?
सुपर ८
मध्ये प्रत्येक संघ आपापल्या गटातील इतर तीन संघांसोबत एकेक सामना खेळणार आहे.
त्यामुळे सुपर ८ मध्ये भारत-पाकिस्तान
यांच्यात सामना होणार नाही. मात्र, सेमिफायनलमध्ये हे दोन्ही
संघ आमनेसामने येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर ग्रुप १ मधून भारत अव्वल
स्थानी राहिला आणि ग्रुप २ मधून पाकिस्तानचा संघ दुसऱ्या स्थानी राहिला तर या दोन
संघांमध्ये पुन्हा लढत होईल.

Post a Comment