नवी दिल्ली - अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे विलीनिकरणाची चर्चा सुरू झाली होती. दोन्ही पक्षात यामुळे
राजकीय रणकंदन देखील पाहायला मिळाले. त्यामुळे विलीनिकरणाची चर्चा झाली होती की
नाही यावर अद्याप खुलासा झालेला नाही. दरम्यान आता यावर शरद पवार यांनीच मौन सोडले
आहे.
राज्यसभा
खासदारकीची शपथ घेतल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील विविध
विषयांवर भाष्य केले. शरद पवार म्हणाले राजकारणात लोकांचे काम करण्यासाठी यावे
लागते. अजितपवार हे लोकांचे काम करण्यासाठी सक्रिय होते. अजित पवारांबद्दल नागरिकांमध्ये आदर
होता. दुर्दैवाने त्यांचे अपघाती निधन झाले. कुटुंब म्हणून आम्हाला त्यांचे दु:ख
आहे. पवार कुटुंबावर संकट आलेले आहे. मी कुटुंबप्रमुख असल्याने माझ्यावर जबाबदारी
आहे.
विलीनिकरणाबाबत अजित पवार-जयंत पाटील यांच्यात बैठका
विलीनिकरणाबाबत
शरद पवार म्हणाले, जयंत पाटील आणि अजित पवार राष्ट्रवादी
विलीनिकरणावर चर्चा करत होते. दोघांमध्ये पाच ते सहा बैठका झाल्या होत्या. बैठक
झाल्यानंतर दोघांपैकी एकजण येऊन मला ब्रिफिंग करत होते. मात्र अजित पवार यांच्या
निधनानंतर ही चर्चा थांबली. आता आमच्या पक्षात याविषयी चर्चा नाही. तसेच भविष्यात
ही प्रक्रिया पुढे जाऊ शकते की नाही हे आज सांगता येणार नाही. अजित पवार यांचा
दृष्टिकोन आम्हाला समाधान देणारा होता. परंतु ते गेल्यामुळे ही चर्चा खंडित झाली.

Post a Comment