पारनेर - पारनेर तालुक्यात सोमवारी (दि.१८) दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या दुदैवी घटनांमध्ये पाण्यात बुडून दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दोन्ही घटनांमुळे पारनेर तालुक्यावर मोठी शोककळा पसरली.
पहिली घटना पारनेर तालुक्याच्या पठार भागावरील बहिरोबावाडी येथे घडली. सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास तिखोल रस्त्यालगत असलेल्या एका शेततळ्यामध्ये परिसरातील साधारण 10 ते 12 लहान मुले आणि काही युवक पोहण्यासाठी गेले होते. यामध्ये साई सिताराम देठे (वय 11) हा मुलगा पाठीला प्लास्टिकचा ड्रम बांधून पोहणे शिकण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, पोहत असताना अचानक त्याच्या पाठीला बांधलेला ड्रम निसटला.
ड्रम सुटल्यामुळे साईचा पाण्याचा अंदाज चुकला आणि तो थेट शेततळ्याच्या खोल पाण्यात बुडू लागला. तो बुडाला हे इतर मुलांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने मदतीसाठी आरडाओरडा केला आणि रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीला थांबवून मदत मागितली. त्या जागरूक नागरिकाने क्षणाचाही विलंब न लावता शेततळ्यात उडी घेतली आणि साई देठे याला तातडीने पाण्याबाहेर काढले. तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे देठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दुसरी घटना याच दिवशी दुपारी दोन वाजेच्या सुमारास नांदूर पठार येथे घडली. येथील मोरदरा पाझर तलाव परिसरातील एका विहिरीमध्ये बाळकृष्ण अनंत कुलकर्णी ऊर्फ बंटीकाका (वय 34) हे पोहण्यासाठी गेले होते. त्यांनी पोहण्याच्या उद्देशाने विहिरीच्या पाण्यात उडी मारली. परंतु, पाण्यात उडी मारल्यानंतर अचानक त्यांना चक्कर आल्यासारखे झाले. शारीरिक अस्वस्थता निर्माण झाल्यामुळे आणि नीट पोहता न आल्यामुळे ते विहिरीच्या खोल पाण्यात बुडू लागले. विहीर बरीच खोल असल्याने त्यांना वेळेत बाहेर काढणे शक्य झाले नाही. त्यांचाही पाण्यात बुडून अंत झाला. या घटनेनंतर त्यांना टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते, मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

Post a Comment