अजित पवारांच्या मृत्यूशी भोंदूबाबा अशोक खरातचा संबंध!, खळबळजनक दावा



मुंबई - अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात अशोक खरात याची सविस्तर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या मृत्यूच्या अवघे 6 दिवस आधी अशोक खरातने तब्बल 4 मोबाईल फोन बदलल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संशयास्पद हालचालींमुळे अजित पवार यांच्या मृत्यूचा थेट संबंध खरातशी असल्याची दाट शक्यता अंजली दमानिया यांनी व्यक्त केली असून, या प्रकरणातील सत्य बाहेर आणण्यासाठी त्याची कसून चौकशी करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत दिवसेंदिवस संभ्रम वाढत असून, हा केवळ अपघात होता की जाणीवपूर्वक केलेला घातपात, असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सीडीआर आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने एक अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, संशयित अशोक खरातने आपला फोन सर्व्हिलन्सवर असल्याच्या भीतीने सतत हँडसेट बदलले असून, यापैकी एक हँडसेट तर केवळ 19 मिनिटांसाठी आणि एकाच फोन कॉलसाठी वापरून बदलण्यात आला होता. त्यामुळे या विमान अपघाताचे गूढ आणखीनच वाढले असून, या प्रकरणाच्या तपासाला आता एक नवे वळण मिळाले आहे.

मृत्यूच्या दिवशी वापरलेला मोबाईल परत कधीच वापरला नाही

अंजली दमानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरात याने 21 ते 31 जानेवारी या अवघ्या 10 दिवसांच्या कालावधीत तब्बल 5 वेळा आपले मोबाईल हँडसेट बदलल्याचे समोर आले आहे. यात सर्वात महत्त्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे, 27 ते 31 जानेवारी दरम्यान त्याने एक फोन वापरला आणि त्यानंतर तो पुन्हा कधीही वापरला नाही. तसेच अजित पवार यांच्या मृत्यूच्या काळात वापरलेले इतर चार फोनही त्याने नंतर पुन्हा कधीच वापरले नाहीत. आपला फोन तपास यंत्रणांच्या सर्व्हिलन्सवर (पाळतीवर) असल्याच्या भीतीनेच खरातने अशा प्रकारे सतत हँडसेट बदलले असावेत, असा गंभीर संशय अंजली दमानिया यांनी वर्तवला आहे.

31 जानेवारीला दिल्ली विमानतळावरच मोबाईल बदलला

अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्यानुसार, 31 जानेवारीला अशोक खरात नाशिकहून दिल्लीला गेला आणि त्याने विमानतळावरच आपला मोबाईल बदलल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, 28 जानेवारीला म्हणजेच अजित पवार यांच्या मृत्यूच्या दिवशीच त्याने फोनचा सर्वाधिक वापर केल्याचेही उघड झाले आहे. या संशयास्पद हालचालींमुळे अजित पवार यांच्या मृत्यूशी खरातचा थेट संबंध असल्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. त्यामुळे खरातने बदललेले ते चारही मोबाईल हँडसेट पोलिसांनी जप्त केले आहेत की नाही याची खातरजमा करून ते तातडीने फॉरेन्सिक लॅबकडे तपासासाठी पाठवावेत आणि पोलीस यंत्रणेने या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत कसून चौकशी करावी, अशी आग्रही मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.

CBI कडे हा तपास देणे गरजेचे- रोहित पवार

अजितदादांच्या अपघात प्रकरणात भोंदू खरातचे कनेक्शन समोर येत असून, ‘त्या’ सहा दिवसांत खरातने चार फोन बदलले, तर एक फोन केवळ 19 मिनिटांचा कॉल करून बदलला. खरातच्या फोनवर सर्वाधिक कॉल अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अजितदादांचे अपघात प्रकरण अतिशय भयानक असून, या प्रकरणात CID कडे माहिती देऊनही कारवाई होत नाही. त्यामुळे तात्काळ CBI कडे हा तपास देणे गरजेचे आहे. सीबीआयकडे तपास देण्यासंदर्भात सरकार त्वरित कार्यवाही करेल, ही अपेक्षा आहे. सरकारने आता जास्त उशीर करायला नको, अन्यथा हे संशयाचं धुकं अधिक गडद होईलच, शिवाय गुन्हेगार पुरावे सुद्धा दडपतील.

 


0/Post a Comment/Comments