मुंबई - शेतकरी कर्जमाफीला आज मंगळवारी (दि.2) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली. आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे थकित कर्ज आता माफ होणार आहे. त्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. या कर्जमाफीची घोषणा सध्या सुरू असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीपू्र्वीच जाहीर केले होते.
विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेले शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाळले आहे. फडणवीस यांनी यंदा अर्थमंत्री म्हणूनही अर्थसंकल्प मांडला. त्याचवेळी त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. अखेर या निर्णयाला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली.
अशी आहे योजना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीककर्ज थकित असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना केली. त्यानुसार पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळेल. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देणार असल्याची घोषणाही फडणवीस यांनी केली होती.
25 हजार कोटींचा भार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने आज मान्यता दिलेल्या शेतकरी कर्जमाफीचा राज्यातल्या एकूण 56 लाख शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यताय. शेतकऱ्यांची तब्बल 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे. मात्र, या यामुळे सरकारच्या तिजोरीवर तब्बल 25 हजार कोटींचा भार पडण्याची शक्यता आहे. एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अनुदान आणि आता दुसरीकडे शेतकरी कर्जमाफी या दोन्ही योजनांमुळे सरकारला आगामी काळात आर्थिक काटकसर करावी लागण्याची शक्यता आहे.

Post a Comment