'लोडशेडिंग' मुळे पंढरीच्या वाटेवरील वारकऱ्यांची गैरसोय; शिवसेना आक्रमक, आंदोलनाचा इशारा


अहिल्यानगर - पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकरी दिंड्यांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात सुरू असलेल्या विजेच्या लोडशेडिंगविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. महावितरणचे अहिल्यानगर येथील अधीक्षक अभियंता सुभाष घाटोळ यांना निवेदन देत संध्याकाळी ७.३० ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू असलेले लोडशेडिंग तात्काळ रद्द करावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. अन्यथा  महावितरणच्या कार्यालयात धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

शिवसेना नेते संदेश कार्ले, नगर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर आणि रणजीत परदेशी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या पंढरपूरकडे हजारो वारकरी दिंड्या मार्गस्थ असून नगर सोलापूर महामार्ग, नगर दौण्ड महामार्गावर अनेक गावांमध्ये दररोज १० ते १२ दिंड्यांचा मुक्काम होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीतून जाण्यासाठी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे. अशा परिस्थितीत संध्याकाळच्या वेळेत वीजपुरवठा खंडित केल्यामुळे वारकऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साप, विंचू यांसारख्या विषारी प्राण्यांचा वावर वाढला आहे. रात्रीच्या अंधारात वीज नसल्याने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ वारकऱ्यांना अंधारामुळे मोठा त्रास सहन करावा लागत असून मुक्कामाच्या ठिकाणी मूलभूत सुविधा विस्कळीत होत आहेत.

यावेळी सरकारच्या धोरणावरही निशाणा साधला. "एकीकडे सरकार शेतकऱ्यांची ४८ हजार कोटी रुपयांची वीजबिल माफी जाहीर करत आहे आणि दुसरीकडे राज्यात लोडशेडिंग सुरू केले जात आहे. ही विरोधाभासी भूमिका असून वारकऱ्यांना त्याची शिक्षा भोगावी लागत आहे.

महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून वारकरी दिंड्यांच्या मार्गावरील लोडशेडिंग रद्द करावे, अशी मागणी करत मागणी मान्य न झाल्यास अधीक्षक अभियंत्यांच्या दालनासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना नेत्यांनी दिला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडीचा घटस्फोट 


 

0/Post a Comment/Comments