मुंबई - नीट परीक्षेतील पेपरफुटी, विद्यार्थ्यांवर झालेला लाठीहल्ला आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जंतरमंतरवर ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या बॅनरखाली सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आता ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार आहेत.
येत्या रविवारी (दि.२६ जुलै) रोजी सकाळी ११:३० वाजता मुंबईत शिवतीर्थ (शिवाजी पार्क) ते श्री सिद्धिविनायक मंदिरादरम्यान एका महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या आंदोलनात महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षही सहभागी होण्याची शक्यता आहे. यावेळी ठाकरे बंधू यांनी केंद्र सरकार आणि पोलिसांच्या भूमिकेवर जोरदार घणाघात केला.
केंद्र सरकारला सत्तेचा माज – राज ठाकरे
पत्रकार परिषदेत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. ते म्हणाले की,”विद्यार्थ्यांचे आंदोलन अत्यंत शांततेत सुरू असताना केंद्राकडून दबाव आणला जात आहे. याआधी शेतकऱ्यांचे आंदोलनही अशाच प्रकारे मोडून काढण्याचा प्रयत्न झाला होता. केंद्र सरकार कुणाचेच ऐकायला तयार नाही, हा कसला सत्तेचा माज आहे?” असा थेट सवाल त्यांनी केला.तसेच हा विषय केवळ शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यापुरता मर्यादित नसून थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचला आहे. आधीच चर्चा केली असती, तर ही वेळ आली नसती. नीटचा पेपर फुटण्याची ही तिसरी वेळ आहे. त्यामुळे आता पालक आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढत आहोत. सिद्धिविनायकाला जाऊन ‘या सरकारला सद्बुद्धी दे’ असे साकडे घालणार आहोत” असेही त्यांनी म्हटले.
भाजपने पाकिस्तानमधून लोक आणली का? उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पोलीस आणि प्रशासनाच्या कारवाईवर अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले की,”आंदोलक मुलींवर लाठीहल्ला करण्यात आला, कपडे फाडण्यात आले. सिव्हिल ड्रेसमधील गुंडांच्या हातात पोलिसांच्या काठ्या कशा काय आल्या? हे आंदोलन मोडून काढण्यासाठी भाजपने काय पाकिस्तानमधून लोक आणली होती का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच न्यायालयाला इतर विषयांवर लक्ष द्यायला वेळ आहे, पण विद्यार्थ्यांच्या या गंभीर प्रश्नावर वेळ नाही. देशातील जनता संतप्त झाली असून, आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून त्या क्रोधाला वाट करून देत आहोत. २६ जुलैच्या मोर्चात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन देशाची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

Post a Comment