६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 'या' मल्लांनी मिळवले थरारक विजय


 
पुणे (प्रतिनिधी) - रामकृष्ण अण्णा सातव पाटील आयोजित ६८ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अत्यंत रंजक आणि थरारक वातावरणात पार पडताना पाहायला मिळाली. स्पर्धेतील प्रत्येक लढतीत मल्लांनी जिद्द, ताकद आणि कौशल्याचा उत्कृष्ट संगम घडवून आणला. कुस्तीप्रेमी प्रेक्षकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मैदानावर उसळणारा जल्लोष, प्रत्येक डावावर उमटणाऱ्या टाळ्या आणि मल्लांना मिळणारे प्रोत्साहन यामुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले होते.

यावेळी माऊली जमदाडे आणि असलम काजी यांनी उपस्थित राहून कुस्तीगीरांना प्रोत्साहन दिले. तसेच अभिनेता गणेश परदेशी यांनीही स्पर्धास्थळी उपस्थित राहून कुस्तीचा आनंद घेत मल्लांचा उत्साह वाढवला. स्पर्धेत विशेष लक्ष वेधून घेतले ते सिकंदर शेख यांनी. त्यांच्या कुस्ती दरम्यान नाकाला इजा झाली होती; मात्र दुखापतीची पर्वा न करता त्यांनी आक्रमक खेळ कायम ठेवत दमदार विजय मिळवला. त्यांच्या जिद्दीचे आणि लढाऊ वृत्तीचे प्रेक्षकांनी जोरदार कौतुक केले.
गादी विभागातील निकालांमध्ये सोलापूर शहराच्या जय पाटील यांनी चेतन रेपाळे अहिल्यानगर यांच्याविरुद्ध प्रेक्षणीय लढतीत २-० अशा फरकाने विजय मिळवला. 

पुणे शहराच्या श्रेयस होळकर आणि नांदेडच्या शिवराज राक्षे यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. या सामन्यात शिवराज राक्षे यांनी १-० अशा अल्प फरकाने विजय नोंदवला. सांगलीच्या सतपाल शिंदे यांच्याविरुद्ध सोलापूर शहराच्या पृथ्वीराज पाटील यांनी ११-० अशा एकतर्फी फरकाने विजय मिळवला.
नाशिक शहराच्या हर्षवर्धन सदगीर यांनी अमरावतीच्या वेताळ शेळके यांचा ८-१ अशा गुणांनी पराभव केला. सोलापूर जिल्ह्याच्या अक्षय मंगवडे यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या सुशांत तांबूळकर यांच्यावर ३-१ अशी मात केली. पुणे जिल्ह्याच्या पृथ्वीराज मोहोळ यांनी धाराशिवच्या धीरज बारस्कर यांना १२-२ अशा गुणांनी नमवले. अकोल्याच्या सिद्धांत गवई यांनी गडचिरोलीच्या संग्राम पाटील यांना १३-३ अशा फरकाने पराभूत केले, तर साताऱ्याच्या दिग्विजय जाधव यांनी हिंगोलीच्या गजानन भोयर यांच्यावर १०-० असा दणदणीत विजय मिळवला.

माती विभागातही कुस्त्या तेवढ्याच रंगल्या. सोलापूर शहराच्या रविराज चव्हाण यांनी धाराशिवच्या शिवराज लोकरे यांचा १०-० अशा फरकाने पराभव केला. रत्नागिरीच्या संतोष दोरवड यांच्याविरुद्ध कोल्हापूर जिल्ह्याच्या शुभम शिदनाळे यांनी ५-० असा विजय मिळवला. पुणे जिल्ह्याच्या सागर देवकाते यांना सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाड यांनी १०-० अशा फरकाने पराभूत केले. सांगलीच्या इम्रान मुजावर यांना प्रतिस्पर्धी सिद्धेश पाटील (कल्याण) गैरहजर राहिल्याने विजय मिळाला. पुणे जिल्ह्याच्या मनिष रायते आणि हिंगोलीच्या सिकंदर शेख यांच्यातील लढतीत सिकंदर शेख यांनी ८-२ अशा गुणांनी विजय नोंदवला. नाशिक जिल्ह्याच्या बाळू बोडके यांच्याविरुद्ध गडचिरोलीच्या विक्रमसिंग भोसले यांनी ४-१ अशी मात केली. नंदुरबारच्या शशिकांत जमाळे यांना अहिल्यानगरच्या सुदर्शन कोतकर यांनी ६-० अशा फरकाने पराभूत केले.

एकूणच, रामकृष्ण (अण्णा सातव पाटील आयोजित ६८ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील गादी आणि माती विभागातील या लढतींनी स्पर्धेची रंगत आणखी वाढवली. मल्लांच्या जिद्दीबरोबरच प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे स्पर्धेला खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या पारंपरिक कुस्ती संस्कृतीचा भव्य उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले. यावेळी ५ विजयी माजी महाराष्ट्र केसरीचा सन्मान करण्यात आला.


 

 

0/Post a Comment/Comments