उधमपूर - जम्मू-काश्मीरच्या ऊधमपूर जिल्ह्यातील रामनगर भागात सोमवारी सकाळी भीषण अपघात घडला. रामनगरहून येणारी बस कागोटजवळ रस्त्यापासून सुमारे १०० फूट खाली कोसळून उलटली. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, या अपघातात २१ जणांचा मृत्यू झाला असून २९ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
जखमींच्या म्हणण्यानुसार, बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते आणि ती भरधाव वेगाने धावत होती. कागोट नाल्याजवळ अचानक एक टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यापासून खाली कोसळली. या अपघातात बसचा वरचा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला.
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले की, अपघातात सामील असलेली बस सार्वजनिक वाहतुकीचे वाहन होते. जखमींवर जीएमसी उधमपूर येथे उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी मृतांबद्दल शोक व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५०,००० रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली.
अपघाताच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की, बसमधील क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आणि अतिवेग यामुळे हा अपघात झाला. जखमी प्रवाशांची चौकशी केली असता, त्यांनी सांगितले की चालक खूप वेगाने गाडी चालवत होता. टायर फुटल्यामुळे बसचा वेग नियंत्रणात राहिला नाही, ज्यामुळे ती सुमारे १०० फूट उंचीवरून खाली कोसळली.

Post a Comment