माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना मोठा दिलासा; ईडीची पीडा संपली, नेमकं काय घडलं?



मुंबई - माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावरील ईडीचा फास मोकळा झाला आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस अगोदर ईडीची पीडा संपली आहे. साखर कारखाना खरेदी प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरू होती. या प्रकरणात आज बुधवारी (दि.२२) कोर्टात प्राजक्त तनपुरे यांच्या बाजूने निकाल लागला. कोर्टाच्या निकालाच्या टायमिंगमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील हेटीसुरला येथे स्थित राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना हा १९९८ मध्ये रणजित देशमुख यांनी सुरू केला होता. आर्थिक अडचणींमुळे हा कारखाना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जप्त केला होता. त्यानंतर या कारखान्याची २०१२ मध्ये विक्री झाली. तनपुरे यांनी हा कारखाना 13 कोटींना विकत घेतला असून राहुरी तालुक्यात शिफ्ट करून 'प्रसाद शुगर' नावाने खासगी साखर कारखाना सुरू आहे.

कारखान्याशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे

या कारखान्याची स्थापना १९९८ मध्ये स्थापन झाली. कारखाना कालांतराने कर्जामुळे बंद झाला. कारखान्याच्या विक्रीत अनियमिततेचा संशय होता. त्यामुळे ईडीने (सक्तवसुली संचालनालय) आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याशी संबंधित १३ कोटींपेक्षा जास्त मालमत्ता जप्त केली होती.

२६ कोटींचा कारखाना तनपुरे यांना अवघ्या १३ कोटींत विकल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात ईडीचा तपास सुरू होता. ईडीच्या कारवाई विरोधात प्राजक्त तनपूरे यांनी कोर्टात धाव घेतली होती. अखेर निकाल प्राजक्त तनपुरे यांच्या बाजूने लागल्याने त्यांची ईडीची पिडा संपली.

 


0/Post a Comment/Comments