उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केले संघटनात्मक बदल



मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा संघटनात्मक बदल करण्यात आला असून, पक्षाच्या नेतृत्वाची जबाबदारी आता तीन पातळ्यांवर विभागण्यात आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रे स्वतःकडे घेतलेल्या सुनेत्रा पवार यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पक्ष अधिक प्रभावीपणे चालवण्यासाठी आणि भविष्यातील राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ही नवी रचना लागू करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

या नव्या व्यवस्थेनुसार, सुनेत्रा पवार राज्यभर दौरे करत पक्ष संघटनेचे काम पाहणार आहेत. त्या थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षाची घडी मजबूत करण्यावर भर देणार आहेत. तर खासदार पार्थ पवार यांच्याकडे दिल्ली आणि मुंबईतील राजकीय कामकाजाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामुळे राष्ट्रीय पातळीवरील संपर्क आणि समन्वय अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

याचबरोबर, अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांच्याकडे बारामती आणि पुणे ग्रामीण भागाची जबाबदारी देण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम जय पवार सांभाळणार आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी बारामती परिसरात जनसंपर्क वाढवल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, पक्षात गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत हालचाली वाढल्या होत्या. अजित पवार यांच्या निधनानंतर काही ज्येष्ठ नेते पक्षाची सूत्रे स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चा होत्या. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी पक्षाचे नियंत्रण कुटुंबाच्या हातात ठेवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भविष्यात कोणताही राजकीय धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

अजित पवार यांच्या पश्चात पार्थ पवार आणि जय पवार हे दोघेही राजकारणात अधिक सक्रिय झाले आहेत. पार्थ पवार राज्यसभेवर निवडून गेले असून राष्ट्रीय स्तरावर काम करत आहेत. तर जय पवार बारामतीत संघटन उभारणीवर लक्ष केंद्रित करत आहेत. या दोघांच्या वाढत्या सक्रियतेमुळे पक्षात नवे नेतृत्व पुढे येत असल्याचे चित्र दिसत आहे.

राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारण रंगण्याची चिन्हे

दरम्यान, बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2029 च्या विधानसभा निवडणुकीबाबतही चर्चा रंगू लागल्या आहेत. जय पवार यांनी भविष्यात उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी भविष्यात पवार विरुद्ध पवार अशी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली. त्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारण आणखी रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.


 

0/Post a Comment/Comments