पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्यात पुढील 6 महिन्यांपर्यंत कोणत्याही मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार नसल्याची घोषणा केली. आज जगावर एक मोठे संकट आहे. या संकटाच्या काळात पंतप्रधान मोदींनी आपल्याकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. त्यानुसार सरकार पुढील 6 महिने कोणत्याही मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करणार नाही, असे ते म्हणालेत. सरकारने इतर देशांच्या तुलनेत केवळ साडे 3 टक्क्यांची दरवाढ केल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
साताऱ्यात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा व महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ सोहळा पार पडला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सरकारने मागच्या 2 वर्षांत 50 लाख लाडक्या बहिणींना लखपती दीदी केले. पण आम्ही एवढ्यावरच थांबणार नाही. आमच्या 1 कोटी बहिणी लखपती दीदी होतील. त्या खऱ्या अर्थाने आपल्या अर्थव्यवस्थेचे संचालन करतील. मोदींनी हेच ओळखले. देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियनची करायची असेल, तर केवळ भावांच्या भरवशावर राहून चालणार नाही. त्यासाठी बहिणींनाच अर्थव्यवस्थेत आणावे लागेल. त्यामुळे बहिणी याकामी उतरल्या तर देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन झाल्याशिवाय राहणार नाही.
भारतात केवळ साडे 3 टक्के दरवाढ
मुख्यमंत्री म्हणाले, आज जगात मोठे संकट आहे. या संकटाच्या काळात पंतप्रधान मोदींनी आपल्याकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. येत्या 6 महिन्यांतील हा आमचा शेवटचा मोठा कार्यक्रम आहे. आता सरकार मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करणार नाही. मोदींनी जे सांगितले ते देशहितासाठी सांगत आहेत. आज जगभरात इंधनाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. अमेरिकेत 51 टक्के वाढ झाली आहे. तर ब्रिटनमध्ये 22 टक्के, फ्रान्समध्ये 25, जपानमध्ये 35 टक्के, जर्मनीत 27 टक्के, इस्त्रायलमध्ये 30, दक्षिण कोरियात 30 टक्के, इटलीत 30 टक्के, सिंगापूरमध्ये 30, पाकिस्तानसारख्या देशात तर तब्बल 200 टक्के वाढ झाली आहे. याऊलट मोदींनी आपल्या देशात केवळ साडे 3 टक्के दरवाढ केली आहे. त्यांनी एवढे दिवस ही वाढ होऊही दिली नाही.
कांद्याची 12 रुपये 35 पैशांनी खरेदी सुरू
मुख्यमंत्र्यांनी यावेळी आजपासून महाराष्ट्रात कांद्याची 12 रुपये 35 पैसे दराने खरेदी होणार असल्याचीही घोषणा केली. ते म्हणाले, कांदा उत्पादक शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत सापडला आहे. कांदा विकत घ्या अशी विनंती मी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे केली होती. या विनंतीला मान देऊन आजपासून महाराष्ट्रामध्ये शिवराज चौहान यांच्या नेतृत्वात 12 रुपये 35 पैशांनी कांद्याची खरेदी सुरू होत आहे. केंद्र व राज्य सरकार मिळून ऊस कारखानदारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरील संकट दूर करेल.

Post a Comment