मुंबई - महाराष्ट्रासह देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बफर स्टॉक कार्यक्रमांतर्गत कांदा खरेदीच्या दरात वाढ करण्यात आली असून आता सरकार 16.50 रुपये प्रति किलो म्हणजेच 1,650 रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करणार आहे. सुधारित दर आजपासून लागू होणार असल्याची माहिती केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली.
कांदा खरेदीत 70 पैशांची वाढ
कांद्याच्या बाजारभावातील चढ-उतार लक्षात घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी करून साठा तयार करते. यापूर्वी सरकारकडून 15.80 रुपये प्रति किलो दराने कांदा खरेदी केला जात होता. मात्र आता त्यात 70 पैशांची वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ग्राहक व्यवहार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत कांदा खरेदी प्रक्रिया अधिक प्रभावी करण्याबरोबरच शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा यावर चर्चा झाली. त्यानंतर सरकारने खरेदी दर वाढवण्याचा निर्णय घेतला. सध्याचे बाजारभाव आणि दीर्घकालीन साठवणुकीसाठी योग्य असलेल्या कांद्याच्या गुणवत्तेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे जोशी यांनी स्पष्ट केले.
कांद्याचा खरेदी दर थेट 2500 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत वाढवावा- पवार
दरम्यान, कांदा खरेदी दरवाढीच्या निर्णयावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत सरकारचे आभार मानले आहेत. सरकारने कांद्याचा खरेदी दर प्रतिक्विंटल १२०० रुपयांवरून १५८० रुपये आणि आता १६५० रुपयांपर्यंत वाढवला असला, तरी ही वाढ अपुरी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा द्यायचा असेल तर कांद्याचा खरेदी दर थेट २५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत वाढवावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच नाफेडमार्फत २ लाख टन कांदा खरेदीची घोषणा झाली असली तरी नाशिकमध्ये गेल्या पंधरा दिवसांत अवघ्या १०० टन कांद्याचीच खरेदी झाल्याचा दावा करत त्यांनी खरेदी प्रक्रियेतील संथ गती आणि जाचक अटींवर टीका केली. नाफेड, एनसीसीएफ आणि वखार महामंडळाला स्पष्ट निर्देश देऊन कांदा खरेदीची प्रक्रिया वेगवान करावी आणि नियम शिथिल करावेत, अशी मागणीही रोहित पवार यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे केली.

Post a Comment