अहिल्यानगर - राज्य सरकारच्या गृह मंत्रालयाने अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ते आता अहिल्यानगर रेल्वे स्थानक केल्याचा आदेश ११ सप्टेंबर रोजी काढण्यात आला आहे. या संदर्भात गृहमंत्रालयाचे सहसचिव राजेश होळकर यांनी ही अधिसूचना जारी केली आहे. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने या संदर्भात ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर राज्य सरकारच्या गृह मंत्रालयाने ही अधिसूचना जारी केली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी (ता. जामखेड) येथे आहे. अहिल्यादेवी यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त ३१ मे २०२४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौंडी येथील कार्यक्रमात अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याची घोषणा केली होती.
तत्कालीन आमदार राम शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर यांनी नामांतराची मागणी केली होती. तत्कालीन विधिमंडळाच्या अधिवेशनात तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अधिवेशनात नामांतराची मागणी मान्य करत अहमदनगर महापालिकेकडे नामांतराचा ठराव करण्याची सूचना पाठवली होती. प्रशासक राजवट सुरू झाल्यानंतर प्रशासकीय महासभेत नामांतराचा ठराव करण्यात आला. त्यानंतर महसूल व वन विभागाने अहमदनगर शहर, उपविभाग व जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर केल्याची अधिसूचना ८ ऑक्टोबर २०२४ रोजी जारी केली होती.
राज्य सरकारने नाव बदलले असले तरी केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विभागांची नावे मात्र त्यानंतरही अहमदनगरच राहिलेले आहे. आता केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने २ सप्टेंबर २०२५ रोजी अहमदनगर रेल्वेस्थानकाचे नामांतर अहिल्यानगर रेल्वे स्थानक करण्यास ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे त्यानंतर राज्य सरकारच्या गृह मंत्रालयाने रेल्वेस्थानकाचे नामांतर केल्याची अधिसूचना जारी केली आहे.
Post a Comment