अहिल्यानगर- छत्रपती संभाजी नगर महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थेमुळे अपघातात अनेक निष्पापांचे बळी जात आहेत. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी इमामपूर घाटात झालेल्या अपघातात धनगरवाडी येथील शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सदर घटनेमुळे प्रहार संघटना व धनगरवाडी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. मयत शेतकऱ्याचा मृतदेह महामार्गावर ठेवून आंदोलन करण्यात आले. तसेच महामार्गाच्या कामाचा प्रश्न मार्गी न लागल्यास दशक्रिया विधी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दालनात करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
इमामपूर घाटातील हॉटेल निसर्ग जवळ झालेल्या अपघातात धनगरवाडी येथील शेतकरी हनुमंत राधुजी शिकारे (वय ५३, रा. धनगरवाडी, ता.नगर) यांचा मृत्यू झाला आहे. महामार्गाच्या दुरावस्थेमुळेच अपघातांची संख्या वाढली असून शेतकऱ्याच्या मृत्यूलाही महामार्गावरील खड्डेच जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून महामार्गा लगतचे विविध गावचे ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक संघटना महामार्ग दुरुस्तीची मागणी करत आहेत. तसेच महामार्गाच्या दुरुस्तीसाठी आंदोलने, गांधीगिरी करण्यात आली होती. परंतु प्रशासनावर त्याचा काहीही परिणाम झालेला नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
महामार्गाची दुरावस्था झाली असताना देखील मनमाड महामार्गावरील वाहतूक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वळविण्यात आल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. महामार्गाची दुरावस्था व मनमाड महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आल्याने अपघातात अनेक निष्पापांचे बळी जात आहेत. अनेक लोकांचे संसार उघड्यावर येत असून देखील प्रशासनाकडून कारवाई होत नाही. त्यामुळे प्रहार संघटना व धनगरवाडी ग्रामस्थ खूपच आक्रमक झाले होते.
शेतकऱ्याचा मृतदेह महामार्गावरच ठेवून सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. महामार्गाच्या दुरावस्थेबाबत प्रशासनावर तीव्र शब्दात रोष व्यक्त करण्यात आला. तसेच महामार्गाचे काम तात्काळ मार्गी लागले नाही तर संबंधित शेतकऱ्याचा दशक्रिया विधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दालनात करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष रामेश्वर निमसे, सल्लागार समितीचे जिल्हाध्यक्ष मालोजी शिकारे, किशोर शिकारे, रमेश भोजने, संदीप कापडे, सोपानराव शिकारे, विष्णू आढाव, बाळासाहेब शिकारे, रमेश गवळी, सखाराम गवळी, इंद्रभान शिकारे यांच्यासह प्रहार संघटनेचे कार्यकर्ते व धनगर वाडीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment