मुंबई - ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांना लग्नकार्यासारख्या शुभप्रसंगी खासगी वाहनांचा महागडा खर्च परवडत नाही. म्हणूनच अशा प्रसंगी अत्यंत माफक आणि सवलतीच्या दरात एसटी बस उपलब्ध करून देण्याची एक अभिनव योजना राबवण्याचा विचार शासन करत असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली.
सुनील शिंदे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. या चर्चेत डॉ. नीलम गोऱ्हे आणि ॲड. निरंजन डावखरे यांनी भाग घेतला. त्याला उत्तर देताना परिवहनमंत्र्यांनी ही घोषणा केली.
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, मालवाहू वाहनांमधून बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर आता केवळ दंडात्मक कारवाई न करता, त्यांचे वाहन परवाने थेट रद्द करण्याचे कठोर निर्देश देण्यात आले आहेत.
बळी घेणाऱ्यांवर थेट गुन्हे
परिवहनमंत्री सरनाईक यांनी सांगितले की, अलीकडेच घडलेल्या दोन वेगवेगळ्या भीषण अपघातांमध्ये अनुक्रमे १३ आणि ११ निष्पाप प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. या दोन्ही दुर्घटनांमध्ये ‘मालवाहू वाहनांमधून केलेली अवैध प्रवासी वाहतूक’ हेच मुख्य कारण होते. केवळ चालकांवरच नव्हे तर संबंधित वाहन मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लवकरच ५ लाख मदत देण्यात येईल.

Post a Comment