प्रेमविवाह केला आणि जीव गमावला, नगर शहरात तरुणासोबत घडले भयंकर...



अहिल्यानगर (प्रतिनिधी) -  प्रेमविवाहाला मुलीच्या आई-वडिलांचा तीव्र विरोध, सततचा शारीरिक-मानसिक छळ आणि विवाहितेला नांदायला न पाठवल्याने येथील तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अक्षय अशोक उमाप (वय 32, रा. सर्जेपुरा, अहिल्यानगर) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

या प्रकरणी अक्षयची बहीण आकांक्षा शरद पवार (वय 30, रा. पिंपळगाव माळवी, ता. अहिल्यानगर) यांनी शनिवारी (6 डिसेंबर) दिलेल्या फिर्यादीवरून सुनील मंडलिक व ज्योती सुनील मंडलिक (दोघे रा. देवसडे, कुकाणा, ता. नेवासा) यांच्याविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. अक्षय उमाप आणि प्रेरणा मंडलिक (सासरीचे नाव- प्रेरणा अक्षय उमाप) यांचा पुण्यात प्रेमविवाह झाला होता.

मुलीच्या आई-वडिलांचा या विवाहास विरोध असल्याने ते लग्नास उपस्थित राहिले नव्हते. लग्नानंतर हे दाम्पत्य सर्जेपुरा येथे नांदत होते. दरम्यान, दिवाळीच्या भाऊबीजेसाठी ऑक्टोबरमध्ये आकांक्षा पवार यांनी अक्षय आणि प्रेरणाला पिंपळगाव माळवी येथे बोलावले होते. त्याच दिवशी सायंकाळी प्रेरणाचे आई-वडील तिथे आले. पहिली दिवाळी असल्याने तिला दोन दिवसांसाठी माहेरी पाठवा, परत पाठवतो, असे सांगत त्यांनी प्रेरणाला सोबत नेले. मात्र, त्यांनी तिला पुन्हा नांदायला पाठवले नाही. अक्षय व त्याची बहीण यांनी अनेकदा फोन करून विचारणा केली असता, तिचे दुसरे लग्न जमवले आहे, फोन करू नका, अशा धमक्या दिल्या गेल्या, असे फिर्यादीत नमूद आहे.

पत्नीला आणण्यासाठी अक्षय देवसडे येथे गेला असता, तिच्या आई-वडिलांनी त्याला मारहाण करून हाकलून दिले. 3 डिसेंबरलाही तो पत्नीला भेटण्यासाठी गेला असता, पुन्हा मारहाण करण्यात आली आणि पत्नीला भेटू दिले नाही. सततचा हा छळ व मानसिक त्रास असह्य झाल्याने 4 डिसेंबर रोजी दुपारी अक्षयने सर्जेपुरा येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठी व मोबाईलमधील व्हिडिओ क्लिपमध्ये प्रेरणाच्या आई-वडिलांच्या जाचास कंटाळून आत्महत्या केल्याचे स्पष्ट केले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.



0/Post a Comment/Comments