सासू, सासरा आणि नणंद यांचा छळ असह्य, तरुण विवाहितेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन



अहिल्यानगर - सासू, सासरा आणि नणंद या तिघांनी सोन्याचे दागिने करण्यासाठी माहेरून पैसे आणावेत तसेच विविध कारणांवरून कुरापती काढत केलेल्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने घरापाठीमागील विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना नगर तालुक्यातील इमामपूर येथे घडली. जयश्री अक्षय टिमकरे (वय २४, रा. इमामपूर, ता. नगर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी तिघांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

इमामपूर (ता. नगर) येथील शेतातील विहिरीत पडून २४ वर्षीय तरूण विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.२७ डिसेंबर) पहाटे उघडकीस आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास जयश्री टिमकरे या शेतातील विहिरीच्या पाण्यात पडून बुडालेल्या अवस्थेत आढळून आल्या.

हा प्रकार नातेवाईकांसह स्थानिकांच्या लक्षात आला. त्यांनी जयश्री टिमकरे यांना विहिरीतून बाहेर काढले व नातेवाईक यांनी त्यांना उपचारासाठी पहाटे सुमारे ३.१५ वाजता नगर येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. तशी माहिती डॉ. पोहे यांनी रूग्णालयात ड्युटीवरील पोलीस अंमलदार गांगुर्डे यांना दिली. त्यांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी तसेच पथकाने घटनास्थळास भेट दिली.

दरम्यान मयत जयश्रीचे वडील अशोक निवृत्ती खंडागळे (रा. वांजोळी, पांढरीपुल, ता. नेवासा) यांनी रविवारी (दि.२८) एमआयडीसी पोलिस ठाण्यात जयश्रीचा सासरा मल्हारी टिमकरे, सासू लिलाबाई टिमकरे व नणंद अश्विनी गणेश चव्हाण यांच्या विरुद्ध फिर्याद दिली. या तिघांच्या सततच्या त्रासाला कंटाळून जयश्री हिने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली असून तिला या तिघांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 




0/Post a Comment/Comments