अहिल्यानगर मध्ये महिलेच्या त्रासाला कंटाळून एकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या


अहिल्यानगर - सावेडी भागातील एका ४५ वर्षीय व्यक्तीने महिलेच्या सततच्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सदर महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मयत गंगाधर पाराजी वारुळे (वय ४५, रा. तपोवन रोड, सावेडी) यांच्या पत्नी रोहिणी गंगाधर वारुळे (वय ४१) यांनी १२ मार्च रोजी फिर्याद दिली आहे. एकविरा चौक, पाईपलाईन रोड येथे राहणाऱ्या या महिलेने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गंगाधर वारुळे यांच्या कडे वारंवार पैशांची मागणी केली होती. पैसे न दिल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची आणि समाजात बदनामी करण्याची धमकी तिने वेळोवेळी दिली.  

या मानसिक छळाला कंटाळून वारुळे यांनी ७ मार्च रोजी पहाटे ते ११ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या दरम्यान बुऱ्हाणनगर परिसरातील एका शेतजमिनीतील विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपवले.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष कुमार वमने आणि पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांनी घटनास्थळी भेट दिली.

या प्रकरणी मृत व्यक्तीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून त्या महिले विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम श्रीवास्तव करत आहेत. बदनामीच्या भीतीपोटी एका व्यक्तीला टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडल्यामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.

हे ही वाचा ...

पौराणिक कथा... समुद्राचे पाणी कोणाच्या शापामुळे खारट झाले ! 

ना कंगना, ना कियारा; 'ही' अभिनेत्री साकारणार मधुबाला 



0/Post a Comment/Comments